मुंबई : भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या समाजकल्याण निधीतून 746 कोटी रुपये वळवले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. जर सगळे पैसे वळवायचे असतील तर एससी-एसटी विभाग बंद करा, ते फक्त औपचारिकतेसाठी का सुरू ठेवले जाते? भाजप आणि काँग्रेस दोघांनीही वारंवार अनुसूचित जाती, जमातींना धोका दिला आहे, असा संताप प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वी, महाराष्ट्रातील भाजपने बजेटमधून 7000 कोटी रुपये वळवले होते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी ठेवण्यात आलेले 25 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे दोन वर्षांत हमी योजनांसाठी वळवले आहेत.यावरून भाजप आणि काँग्रेसला अनुसूचित जाती आणि जमातींवर किती प्रेम आहे हे दिसून येते, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या समाजकल्याण निधीतून ७४६ कोटी रुपये वळवले!
जर सगळे पैसे वळवायचे असतील तर एससी/एसटी विभाग बंद करा!
ते फक्त औपचारिकतेसाठी का सुरू ठेवले जाते?
हे अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचारापेक्षा कमी नाही!
भाजप आणि काँग्रेस… pic.twitter.com/wigwBMd3D8
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 4, 2025
अंबादास दानवे यांची टीका
अंबादास दानवे यांनी ट्विट करत दावा केला की, सरकारने लाडक्या बहिणींसाठी आदिवासींच्या हक्काचे पैसे पळवले असल्याचे म्हटले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले! हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही, असे असतानाही सरकारने निधी वळवल्याचा आरोप दानवे यांनी केला.
संजय शिरसाट नाराज?
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळवल्याने नाराजी व्यक्त केली. शिरसाट यांनी म्हटले की, 100 दिवसांच्या कार्यक्रमात आदिती तटकरे यांचा विभाग पहिला आला. आमचा विभाग पहिला कसा येणार आमचा निधी त्यांच्याकडे वळवण्यात आल्या. आमच्या विभागाकडे निधी नसेल आणि तो दुसऱ्या विभागाकडे वळवणार असाल तर आम्ही काम कसे करणार, असा सवाल देखील शिरसाट यांनी विचारला.