भारत – पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय सातत्याने घेतले जात आहेत. राज्यात देखील त्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. बैठकांचा सिलसीला सुरू आहे. त्यामध्ये आता गृहविभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील ६ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
कुणाची कुठे बदली?
आयपीएस अधिकारी सुधनल रामानांद हे अपर पोलीस महासांचालक, नियोजन व समन्वय विभागात मुंबई येथे कार्यरत होते त्यांची बदली पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. राजकुमार व्हटकर अपर पोलीस महासांचालक, प्रशिक्षण आणि खास पथके विभागात मुंबईत कार्यरत होते. त्यांची बदली मुंबई येथे पोलीस बल अप्पर पोलीस महासंचालक येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन विभागात मुंबईत कार्यरत होते. त्यांची बदली मुंबईत प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे.

अधिकारी प्रवीण साळुंके हे लोहमार्ग विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली महामार्ग सुरक्षा विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर मुंबई येथे झाली आहे. पुढे प्रभात कुमार हे संचालक, नागरी संरक्षण विभागात कार्यरत होते. त्यांचे पद उन्नत करण्यात आले आहे. प्रशांत बुरडे, अप्पर पोलीस महासंचालक पदावर, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे कार्यरत होते. त्यांची बदली लोहमार्ग विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून मुंबई येथे करण्यात आली आहे.
आणखी काही बदल्यांची शक्यता
आगामी काळात प्रशासन आणि पोलीस दलातील समन्वय साधण्याच्या दृष्टीने आणखी काही बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये कार्यक्षमता वाढवणे हा उद्देश प्रामुख्याने असणार आहे. शिवाय भारत – पाक युध्दाच्या तणावपूर्ण वातावरणात या बदल्यांना विशेष महत्व आहे.