‘प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती योग्य नाही,’ शरद पवार स्पष्टच बोलले…

प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती योग्य नाही, असं मत शरद पवारांनी मांडलं आहे. हिंदी-मराठी वाद सुरू असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील शाळांत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकवटले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्रित आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनी देखील या निर्णयाबाबत मोठं विधान केले आहे. शिवाय हिंदीला पूर्णपणे नाकारून चालणार असं देखील पवारांनी म्हटलं आहे.

‘प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती नको’

“प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती योग्य नाही. पहिली ते चौथी हिंदी सक्ती करणं योग्य नाही. पाचवीनंतर हिंदी शिकवण्यास हरकत नाही. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. शक्तीपीठला विरोध का आहे, हे समजून घ्यायचय” असं शरद पवार म्हणाले. शाळांत हिंदी सक्तीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणार आहेत, तर दुसरीडे शरद पवार यांनी हिंदी भाषेबाबत मोठं विधान केलं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, परंतु पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर ती लादणं योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे बंधूंची भूमिका समजून घेईल – पवार

दोन्ही ठाकरेंची वक्तव्ये मी वाचली, मुंबईला गेल्यावर मी त्यांची भूमिका मी समजून घेणार आहे. त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी इतर राजकीय पक्षांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे मोर्चात सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय आहे हे समजून घ्यावं लागेल.

5 जुलैला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा

हा मोर्चा एकत्रच निघणार का, अशी चर्चा होत असताना आता संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!” असं ट्विटमध्ये राऊतांनी म्हटले आहे. मागील दीड-दोन महिन्यापासून दोन ठाकरे बंधू एकत्र यावे. महाराष्ट्राच्या हितासाठी… मराठी माणसाच्या हितासाठी… एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते हे आपापल्या परीने वक्तव्य करताहेत. पण आता मराठीच्या मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र येणार मोर्चा काढणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News