चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय झालाच नाही, शरद पवारांच्या आमदाराने सरकारला केले टार्गेट

चौंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जायला हवा होता, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली

कर्जत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे झाली. ही बैठक चौंडी येथे होत असल्याने धनगर आरक्षणाच्या संदर्भात मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ही शक्यता फेल ठरली. धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आली नाही.

आरक्षणाबाबत निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन आज १० वर्षे उलटली आणि ३०० हून अधिक मंत्रिमंडळ बैठका झाल्या.. शिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय अजूनही का होऊ शकला नाही?’, असा सवाल पवार यांनी विचारला.

अभ्यास अजूनही सुरूच

धनगर आरक्षणचा निर्णय न झाल्याने रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आणि केंद्राची मान्यता घेतली की लगेच प्रश्न मिटेल, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? राज्यसरकारचे सकारात्मक प्रयत्न कधी फळास येतील?

दगाफटका करणार नाही…

किमान आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चोंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जाईल याची राज्यातील तमाम धनगर समाज बांधव वाट बघत आहेत. या पवित्र भूमीचे पावित्र्य लक्षात ठेवून तरी सरकार नेहमीप्रमाणे केवळ पोकळ घोषणा करून आणि आश्वासने देऊन बोळवण करणार नाही आणि दगाफटका करणार नाही, ही अपेक्षा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News