पुणे : मस्साजोगचे हत्या करण्यात आलेले सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीला बारावीच्या परीक्षेत 85 टक्के मिळाले आहेत. वैभवीवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ती आपल्या वडिलांच्या आठवणीने भावूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैभवीचे अभिनंदन केले आहे.
सुषमा अंधारे यांनी वैभवीला सलाम करणारी आणि तिचे अभिनंदन करणारी पोस्ट फेसबूकला शेअर केली आहे. त्यामध्ये अंधारे म्हणाल्या आहेत की, वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा… मला खात्री आहे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगांमध्ये तुझा विवेक हरवणार नाही.

वैभवीचे यश कौतुकास्पद
कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी आपला विवेक हरवता कामा नये. चांगुलपणावर असणारी निष्ठा आणि सात्विक मूल्य आपण जपली पाहिजे. हा संस्कार मागील सहा महिन्यांपासून ज्या वैभवीच्या ठाई आपण सगळ्यांनी बघितला. तिचा बारावीचा निकाल कौतुकास्पद आहे, असे देखील अंधारे यांनी म्हटले आहे.
चांगुलपणाचा गोडवा जतन करशील
एकीकडे वडिलांची अत्यंत क्रूर हत्या.. दहशत.. राज्यभरातले आक्रोश मोर्चे जर आपल्या वडिलांसाठी निघत असतील तर आपण स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे, याचं आत्मभान आणि त्याच वेळेला वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची जाण जपत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. तिचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला. वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा.इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील… खूप खूप अभिनंदन… उंच उंच झेप घे.. तुझ्या झेपेच्या कवेत आकाश आहे, अशा शुभेच्छा देखील सुषमा अंधारेंनी दिल्या आहेत