Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा लाभली आहे. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र जे सहकार कायदे आहेत, त्या कायद्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘प्रकरणे’ दाखल करावी लागणार आहेत. तसेच सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. यासाठी सहकार कायद्यातील बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येणार अंस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सहकार क्षेत्राची सुरुवात कधी?
कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग प्रणाली सहकारी बँकांनी अंगीकारली आहे. तसेच सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत बँकिंग क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. पुणे जिल्ह्यातील सुपे येथे 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव म्हणजे ही सहकार क्षेत्राची पहिला क्रांती आणि सुरुवात ठरली. अशा या ऐतिहासिक घटनेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ, शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150 वर्षानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा पुढाकार
देशभरात सहकारी संस्थांचे सक्षमीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने १० हजार गावांमध्ये सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘ बिजनेस मॉडेल ‘ बनविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्ररित्या सहकार मंत्रालय सुरू केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर सहकार चळवळीचे सक्षमीकरण होत आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यानं, भारताच्या महासत्तेच्या वाटचालीमध्ये सहकाराचा मोठा वाटा आहे. भारत वेगाने तिसऱ्या महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.