Prahaar Andolan – पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज विधान भवन परिसरात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. शेतकरी प्रश्नावरुन प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी…
दुसरीकडे एसबीआय बँकेच्या गेटवर चढून विधान भवनाच्या आत जाण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू. खाली डोकं वर पाय आरे, या सरकारचे करायचं काय…, शेतकरी विरोधी सरकार हाय… हाय… अशी घोषणाबाजी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या आंदोलनात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी होते.

आंदोलन कोणत्या कारणासाठी?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकरी कर्जमाफी करू… असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार येऊन सहा महिने झाले तरीसुद्धा शेतकरी कर्जमाफी झाली नाही. दिवसागणिक शेतकरी आत्महत्या वाढताहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही… पिकांना हमीभाव दिला जात नाही… तसेच बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत… बँका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोर-जबरदस्ती करताहेत. या सर्वांच्या विरोधात प्रहार संघटनेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. विधान भवन परिसरातील मुख्य प्रवेशद्वारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तिथे आंदोलन करण्यास मिळणार नाही, म्हणून विधान भवन इमारतीच्या बाजूलाच एसबीआयची बँकेच्या गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला.