अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. हवामान विभागाकडून मान्सून वेळेपूर्वीच केरळमध्ये येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या अंदाजापेक्षाही लवकर मान्सूनचं आगमन झालं आहे. १६ वर्षात पहिल्यांदा मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये पोहोचला आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
आयएमडीने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह कर्नाटकातील किनारा आणि कर्नाटक दक्षिणेकडील अंतर्गत भाग याशिवाय केरळमधील विविध ठिकाणांवर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने गोवा आणि कोकणासाठी 25 मेपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा आणि घाटमाथ्याच्या भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासातही कोकणात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय घाट परिसरातही तुफान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
वेळेपूर्वीच मान्सूनचं केरळमध्ये आगमन…
सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि ८ जुलैपर्यंत देशभरात पोहोचतो. १७ सप्टेंबरच्या जवळपास भारताच्या उत्तर-पश्चिमेकडून भारतातून परतण्यास सुरुवात होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्णपणे परततो.
भारतात आतापर्यंत कोणकोणत्या तारखेला मान्सूनचं आगमन?
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी
२०२४ – ३० मे
२०२३ – ८ जून
२०२२ – २९ मे
२०२१ – ३ जून
२०२० – १ जून
२०१९ – ८ जून
२०१८ – २९ मे रोजी मान्सून दक्षिणेकडील राज्यात दाखल झाला.
यंदा कसा असेल पाऊस?
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, केरळमध्ये मान्सून लवकर आला किंवा उशीरा आला तरी देशातील इतर राज्यांमध्ये तो लवकर पोहोचेल हे निश्चित सांगता येत नाही. हे पूर्णत: वाऱ्यांची दिशा आणि त्यावेळी निर्माण झालेल्या कारणांवर अवलंबून आहे.