पुढील 4 दिवसांचा पावसाचा अंदाज काय? हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर

जून महिना सुरू झाला आहे. आता 1 ते 4 जून दरम्यानच्या काळात हवामान नेमकं कसं राहिल, याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज समोर आला आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

जून महिना आजपासून सुरू झाला आहे. वातावरण आणि हवामान आता काही प्रमाणात बदलणार आहे, याबाबत पुढील 4 दिवसांच्या हवामानाबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सून दाखल झाला तरी वाटचाल रखडली आहे. 1 जून ते 4 जून या काळात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. नेमकं कसं हवामान राहिल, सविस्तर जाणून घेऊ…

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू कमी होत चालला आहे. मात्र, अजूनही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेले नसल्यामुळे मान्सून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रखडला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला, तरी 1 जून ते 4 जून या काळात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पाऊस उघडीप देऊ शकतो.

पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान हलक्या पावसासह मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी मुंबई आणि ठाणे येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. 2 ते 4 जून दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 48 तासांत या भागांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 2 ते 4 जून दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.  कोल्हापूर शहरात 1 जून रोजी हलक्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर मात्र पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि साताऱ्याच्या घाटमाथा भागात आज हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उ. महाराष्ट्रात काय स्थिती?

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा किंवा मेघगर्जनेसह सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मध्यम पाऊसही पडू शकतो. नाशिकच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात 3 आणि 4 जून रोजी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांचा जोर अधिक जाणवू शकतो.विशेषतः अमरावती जिल्ह्यात 3 आणि 4 जून रोजी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना झाडांच्या खाली, विद्युत खांबांजवळ किंवा उघड्यावर थांबणे टाळा. वादळी वाऱ्यांमुळे घरांवरील पत्रे उडून जाणे किंवा झाडे पडण्याचा धोका असतो, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि हवामानाच्या स्थितीनुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये, असं देखील कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News