ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 3 लष्करी जवानांचा समावेश, 6 जवान बेपत्ता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की, पुढील दोन दिवस ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इन्फाळ- सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रविवारी संध्याकाळी संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली भरडला गेला. यात तीन लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. चार जवानांना मातीच्या ढिगाऱ्याखालून वाचवण्यात सैन्याला यश आलंय. तर सहा जवान अद्यापही बेपत्ता आहेत. या जवानांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलंय. दुसरीकडे सिक्कीमच्या लाचेन आणि लाचुंग परिसरात 30 मे पासून अडकलेल्या 1 हजार पर्यटकांची आज सुटका करण्यात आलीय.

सिक्कीमसह ईशान्य भारतात गेल्या चार दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. मुसळधार पावसामुळं पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांत आत्तापर्यंत 37 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात आसाममधील 10, अरुणाचल प्रदेशातील 9, मिझोरमच्या 5 आणि मेघालयातील 6 व्यक्तींचा समावेश आहे.

केंद्राकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य

ईशान्य भारतात उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य, हवाई दल आणि असाम रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आलंय. असाममध्ये 3.64 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसलाय. ब्रह्मपुत्रसह 10 महत्त्वाच्या नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पातळीवर वाहतायेत.


मणिपूरमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसलाय. 3365 घरं पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्रिपुरात 10 हजारांपेक्षा जास्त पूरग्रस्तांचा आकडा आहे. मिझोरमची राजधानी असलेल्या आइजोल शहरात 2 जून रोजी सगळ्या शाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला. 30 मे पासून मिझोरममध्ये दरड कोसळण्याच्या आतापर्यंत 211 घटना घडल्या आहेत.

मध्य प्रेदश आणि राजस्थानला अलर्ट

राजस्थानातील 30 जिल्हे तर मध्य प्रदेशातील 50 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. बिहारमध्येही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. बिहार राज्यांत 9 जिल्ह्यांना वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलाय


About Author

Smita Gangurde

Other Latest News