Mumbai – मान्सून पूर्व तयारीसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. २६ मे रोजी पावसाने मुंबईची तुंबई केली, म्हणून आता पालिका सतर्क झाली आहे. या धरतीवर पालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत तरंगत्या वनस्पती काढणे, तलावातील जलपर्णी काढणे ही कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारी देखील पालिकेने घेतली आहे.
५ हार्वेस्टर संयंत्रा वापर…
दरम्यान, पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पवई तलाव हा सन १८९१ मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर २२३ हेक्टर इतका आहे. जवळपास ६.६ किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टर पर्यंत पसरलेले आहे. तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असे निर्देश पालिकेने देऊन कामं केलीत.

तलावाचे प्रदूषण कमी होण्यास मदत…
दुसरीकडे पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झाली आहे. तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. याचा विचार करुन जलपर्णी काढणे व त्याची विल्हेवाट लावणे, यामुळं पाणीही शुद्ध होते.