समृद्धीचा अखेरचा टप्पा 5 जूनला होणार खुला, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण, मुंबई-नाशिक अंतर केवळ अडीच तासांवर येणार

समृद्धी महामार्गाचा अखएरचा टप्पा 5 जूनला खुला होणार आहे. याबाबत आता अधिकृत माहिती समोर आली आहे.

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेला समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखएरचा टप्पा 5 जूनला खुला होणार आहे. इगतपुरी ते ठाण्यातील आमणे अशा 76 किलोमीटरच्या मार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री इगतपुरीतून तर उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील आमणेतून या मार्गाचं एकाचवेळी लोकार्पण करतील.

1 मेनंतर अखेर मिळाला मुहूर्त

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी समृद्धीच्या अखेरच्या टप्प्यातं लोकार्पण होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र या मार्गावरील अनेक कामे अपूर्ण असल्यानं हे लाकार्पण होऊ शकलं नाही. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून हा मार्ग खुला करण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याचं सांगण्यात येत होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं आता लोकार्पण होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण समृद्धी महामार्ग खुला करुन, विरोधकांची तोंडंही सरकारनं बंद केल्याचं मानण्यात येतंय.

मुंबई-नाशिक अंतर अडीच तासांवर

अखेरचा टप्पा खुला झाल्यानं मुंबई ते नागपूर अंतर आ तासांत तर मुंबई ते नाशिक अंतर अडीच तासात गाठता येणार आहे. समृद्धी नसताना मुंबई ते नाशिक अंतर गाठण्यासाठी पावणेचार तास लागत होते. मात्र समृद्धीने प्रवास केल्यानंतर प्रवाशांचा सुमारे सव्वा तास वाचणार आहे.

अखेरच्या टप्प्यात 7.74 किलोमीटरचा समृद्धीवरील सर्वात मोठा बोगदाही असेल. हा मार्ग सहा लेन असेल. एकूण 701 किलोमीटर मार्गाचा मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग आहे. 2022 साली या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. या महामार्गातील अखेरचा टप्पा इगतपुरी ते आमणे हा मार्ग आव्हानात्मक होता. डोंगरातून जात असलेल्या या मार्गात अनेक अडथळे होते. त्यामुळे हा मार्ग पूर्णत्वास जाण्यास उशीर झाला. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता मुंबई ते नागपूर हे अंतर समृद्धी महामार्गावरुन आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News