काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर आता अकरावी प्रवेशासाठी सर्वांची धावपळ सुरू होणार आहे. विद्यार्थी आणि पालक त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. यंदाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे कष्ट काही प्रमाणात कमी होणार आहेत. 19 मे पासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे.
19 मे पासून ऑनलाईन अर्ज
अकरावी प्रवेशातील महाविद्यालय नोंदणीचे काम सुरु असून येत्या 19 मेपासून प्रवेशाचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहे. याबाबत शालेयशिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली असून या संकेतस्थळावरच अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्त माहिती मिळेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

अकरावीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज दोन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाईन भरून घ्यावा. नोंदणी अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025-26 शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाईन अर्ज भरूनच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी ते समाजमाध्यमांवरील विविध माहितीच्या स्रोतांचा आधार घेतात. त्याऐवजी त्यांना एक अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याच्या विचाराने शालेय शिक्षण विभागाने एका पत्रकाद्वारे या संकेतस्थळाची माहिती दिली.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे, आणि शाळा-महाविद्यालये यांची माहिती मिळणार आहे. त्याशिवाय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील शंका असल्यास, विद्यार्थ्यांना 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, विद्यार्थी आपल्या शंका ई-मेलवरही पाठवू शकतात.