Eknath Shinde : केंद्र सरकारने देशाच्या भूमीतून माओवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू केलेल्या लढयात महाराष्ट्राच्या भूमीत झालेल्या या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, गडचिरोलीमधील भामरागड आणि छत्तीसगड यांच्या सीमावर्ती भागात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 4 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माओवाद विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
माओवाद विरोधी कारवाईला बळ मिळाले…
दरम्यान, गडचिरोली सारख्या भागात मुसळधार पाऊस सुरू असतानाही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून यशस्वी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे, अस एकनाथ शिंदे म्हणाले. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल शिंदे यांनी त्यांचे आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या सर्व सी-60 जवानांचे अभिनंदन केले. तसेच या कारवाईमुळे माओवाद्यांना जशास तसे उत्तर मिळाले असून, माओवाद विरोधी कारवाईला बळ मिळाले आहे. राज्यातून माओवाद संपवण्याचा लढ्याला मिळाले मोठे बळ आहे. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

माओवाद्यांना जशास तसे उत्तर…
२ महिन्यांपूर्वी भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात गडचिरोली पोलिसांनी पोलिस मदत केंद्र सुरू केले होते. या परिसरात माओवाद्यांची हालचाल असल्याचे समजताच सी-60 पथकाच्या 300 जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी या भागात रवाना झाली होती. दरम्यान, सकाळपासून माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केल्याने पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास गोळीबार सुरू राहिला, त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता या कारवाईत 4 माओवाद्यांचा खात्मा झाल्याचे आढळले.