आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीतील पहिला सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना आज 29 मे रोजी मुल्लांपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी म्हणजेच फायनल गाठणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधिक आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या तुलनेत आरसीबीचं पारडं जड वाटत आहे. त्यामुळे आरसीबीचं अंतिम फेरी गाठणं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला देखील क्वालिफायर -2 खेळण्याची संधी मिळणार आहे, कारण हे दोन्ही संघ टॉप 2 होते.
आरसीबीला सामना जिंकण्याचा विश्वास
पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येतील. 29 मे रोजी हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. पंजाब किंग्सने आयपीएल 2025 साखळी फेरीतील 4 सामने मुल्लांपूरमध्ये खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुल्लांपूरचं मैदान पंजाब किंग्सला तितकं भावलेले दिसत नाही. त्यामुळे जय पराजयाचं गणित हे 50-50 आहे. त्यामुळे आरसीबी पंजाब किंग्सच्या कमकुवत बाजूचा लाभ घेत अंतिम फेरी गाठू शकते.

दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर जितेश शर्माने सांगितलं होते की, ‘ हेझलवुड तंदुरुस्त आहे आणि आमच्या संघातील विश्वास प्रणाली खूप मजबूत आहे आणि तुम्ही जे काही खेळाडू पहाल, ते सर्वजण सामना जिंकणारे आहेत आणि जरी आम्ही 3-4 विकेट गमावल्या तरी, आमच्यात नेहमीच विश्वास होता.’
पंजाब की आरसीबी पारडं कुणाचं जड?
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांतील शेवटच्या पाच सामन्यांचा विचार केला असता लक्षात येते की, पैकी आरसीबीने 4 तर पंजाब किंग्सने अवघा 1 सामना जिंकला आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं पारडं जड मानलं जात आहे. आरसीबीने लखनऊ विरूद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला लोळवलं. 227 धावांचं लक्ष्य 18.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह प्लेऑफच्या टॉप 4 मध्ये जागा पक्की केली आहे. असं असताना क्वॉलिफायर 1 सामन्यापूर्वी आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.