Prasad Lad – यावर्षी मुंबईत पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळं नाले सफाई आणि गाळ उपसा ही कामे जी अर्धवट सुरु होती. त्या कामांवरुन आता चांगलेच राजकारण रंगले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, मिठी नदी गाळउपसा घोटाळ्यातील मास्टर माइंड मोकाट आणि छोट्या ठेकेदारांवर फास आवळला जात आहे. असा गंभीर आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मोठे मासे असल्याने घोटाळयाकडे दुर्लक्ष…
दरम्यान, मिठी नदीतील गाळ उपसा यात 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. पण या घोटाळ्यात मोठे मासे अडकले आहेत. म्हणून पालिका प्रशासन व पोलिसांकडून होणारी चौकशी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त 3 ते 7 कोटी रुपयांच्या पारंपारिक निविदा राबविणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे, त्यांची चौकशी केली जात आहे. पण या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून, मुख्य चौकशीपासून जाणूनबुजून भरकटवली जात आहे, असा आरोप भाजपा प्रसाद लाड यांनी केला.

करदात्या मुंबईकरांची घोर फसवणूक…
तनिशा, त्रिदेव, एमबी ब्रदर्स, स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर, स्कायवे इन्फ्रास्ट्रक्चर, या कंपन्यांना ही कंत्राटे मिळावीत म्हणून पद्धतशीरपणे योजना आखली गेली. आणि त्यातून हा भ्रष्ट्राचार केला गेला. असे लाड यांनी म्हटले. मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढून पावसाळ्यात मुंबई तुंबण्यापासून वाचविण्यासाठी दरवर्षी पालिका निविदा काढते. पण यात गेल्या ३ वर्षांमध्ये तब्बल 1000 कोटी रुपयांच्यावर घोटाळा झाला आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांची घोर फसवणूक झाली आहे. असा आरोप प्रसाद लाड यांनी केली.