Eknath Shinde : राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांना गती द्या, वेग वाढवा, सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत. असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.
नवीन ऍक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट
कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर 9 ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी. कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाचा कामाला गती देण्यास सांगितले.

शक्तीपीठ महामार्ग – ग्रामस्थांशी संवाद साधा
नागपूर ते गोवा हे 18 तासांचे अंतर अवघ्या 8 तासांवर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा आजच्या बैठकीत आढावा घेतला. या महामार्गाला कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड येथे होत असलेला विरोध लक्षात घेता ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचा विरोध मावळण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले.
नवीन महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी
महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम सुरु आहे. यात आधी 235 तर आता 294 गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. नव्याने धबधबे, इको फ्रेंडली रस्ते विकसित करून येथील नागरिकांना इथेच रोजगार मिळू शकेल यासाठी प्रयत्न करावेत. या भागात असलेल्या औषधी वनस्पती पाहता डाबर, पतंजलीसारख्या कंपन्यांना आमंत्रित करावे, तसेच वेलनेस सेंटर, निसर्गोपचार केंद्र याना प्रोत्साहन द्यावे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक डिसेंबरअखेर पूर्ण
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.