मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने झालेला गदारोळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मंगळवारी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी 9 अथवा 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे.
भुजबळांना संधी देण्याचे कारण?
छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. राज्यातील ओबीसी मतदारांवर छगन भुजबळांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या वादळात देखील महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्याने 1 लाख 34 हजार 154 मतं पडली होती. त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता. माणिकराव शिंदे यांना 1 लाख 8 हजार 2 मतं पडली होती. त्यामुळे भुजबळांचा महत्व नाकारता येत नाही.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे.
धनंजय मुंडेंचं खातं मिळणार
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मुंडेकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं. मात्र मुंडेच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावरुन वाद होऊ नये म्हणून पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते खातं स्वत:कडे ठेवलं होतं. मात्र आता पु्न्हा एकदा भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांकडे मविआ सरकारमध्येही याच खात्याची जबाबदारी होती. त्यामुळे या निमित्ताने अखेर भुजबळांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आल्याची चर्चा सुरू आहे.