राहुल गांधींचा थेट मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघाबाबत आरोप, निवडणूक आयोगानं घेतली दखल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंगचा आरोप राहुल गांधींनी केलाय, त्यात आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचाच दाखला दिलाय. यावर मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिलंय.

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात शेवटच्या पाच महिन्यात मतदार वाढले आणि मतदानाच्या अखेरच्या एका तासात मतदार संख्या वाढली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅचफिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं होतं. आता राहुल गांधींनी थेट फडणवीस यांच्या मतदारसंघातच मतदारसंख्या वाढल्याचा आरोप केलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात विधानसभेच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत ८ टक्के मतदारांची वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. काही बूथवर मतदारांची संख्या २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या मतदारसंघात अज्ञातांच्या मतदानांचं प्रमाण जास्त असल्याचं सांगत ही मतदानाची चोरी असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. निवडणूक आयोग यावर गप्प का, असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केलाय.

निवडणूक आयोगाकडून राहुल यांना चर्चेचं निमंत्रण

राहुल गांधी यांनी नव्याने आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पत्र लिहिले असून चर्चेसाठी बोलावले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप राहुल यांनी केलाय. आयोगानं पत्रात लिहिलंय की, देशात निवडणुका अत्यंत काटेकोरपणे घेतल्या जातात. मतदानाची ही प्रक्रिया केंद्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय.

फडणवीसांचे सडेतोड उत्तर

राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिलंय. अपमानास्पद पराभवाचं दु:ख वाढल्यामुळे ते असे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. अजून किती काळ खोटे बाण हवेत सोडणार, असा सवालही फडणवीस यांनी केलाय. झूठ बोले कौआ काटे, काले कौवेसे डरयो असं लिहित फडणवीस यांनी यावर उत्तर दिलंय.

फडणवीस काय म्हणालेत?

राहुल गांधी,

महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवाचे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढतंय, हे मान्य करतो.
पण किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात?
तुमच्या माहितीसाठी, महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 8% पेक्षा जास्त मतदार वाढले. यात अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवलाय. दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात 7% मतदार (27,065) वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे तिथं जिंकून आलेत. उत्तर नागपूरमध्ये 7% (29,348) मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी विजय मिळवला.
पुणे जिल्ह्यात, वडगाव शेरीमध्ये, 10% (50,911) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी विजय मिळवला,मालाड पश्चिममध्ये, 11% (38,625) मतदार वाढले काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख यांनी विजय मिळवला. मुंब्रा मतदारसंघामध्ये 9% (46,041) मतदार वाढले आणि शरद पवार राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. या ट्विटपूर्वी त्यांनी अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारख्या त्यांच्याच पक्षाच्या जुन्या मित्रपक्षांशी एकदा बोलले असते तर बरे झाले असते.
किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता.


About Author

Smita Gangurde

Other Latest News