Raju Shetty : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. काही शेतकऱ्यांचा अजूनही विरोध आहे, पण तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतील. कोणावर जबरदस्ती करणार होणार नाही. असं सरकारकडून सांगण्यात येत असताना, आता यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवार लुटणा-या पाखरांना…
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावल्यानंतर आता सरकारकडून ड्रोनच्या माध्यमातून मोजणी केली जात आहे. मात्र “शिवार लुटणा-या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे हे शेतक-यांना चांगल्या पध्दतीने ठाऊक आहे”. त्याच पध्दतीने जमीन मोजणीसाठी येणाऱ्या ड्रोनना गोफनीने टिपण्यासाठी “शेतकऱ्यांनो गोफण आणि दगडं तयार ठेवा”असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधात दंड थोपटले आहेत.

मंत्रिमंडळ ठग व पेंढारीचे लुटारू टोळकं…
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनास २१ हजार कोटी रूपयांची मान्यता दिल्यानंतर शेट्टी यांनी सोशलमीडियाद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ ठग व पेंढारीचे लुटारू टोळकं झाले असल्याची टिका केली. तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प राज्यातील जनतेच्या माथी मारला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राज्यातील अनेक योजनांच्या, शालेय शिष्यवृत्त्यांच्या निधीला कात्री लावली जात असताना आणि राज्यातील हजारो कोटींच्या कामांच्या थकीत बिलासाठी गेल्या वर्षभरापासून ठेकेदार मोर्चे काढत आहेत.