ऑनलाइन तत्काळ तिकीट प्रणालीतील अनेक वर्षांपासून चालू असलेल्या गैरप्रकारांवर अखेर रेल्वेने लक्ष दिलं आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत महत्त्वाचे बदल करणार आहे. हे नवीन बदल १५ जुलैपासून लागू केले जातील. विशेष म्हणजे, हे बदल केवळ ऑनलाइन तात्काळ तिकीटासाठीच नव्हे, तर रेल्वे काउंटर व एजंटद्वारे बुक केल्या जाणाऱ्या तिकीटांवरही लागू असणार आहेत. आता रेल्वे काउंटरवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी एक नवीन नियम पाळावा लागेल. जाणून घ्या काय आहे तो नियम.
काउंटरवरून तात्काळ तिकीटासाठी नवे नियम कधीपासून लागू होतील?
तात्काळ तिकीट मिळवण्याची धांदल लक्षात घेता, बुकिंग प्रणालीत महत्त्वाचे बदल होणार आहेत. रेल्वेला अपेक्षा आहे की, या बदलांमुळे तिकीट बुकिंग प्रणालीतील फसवणूक थांबेल. १५ जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या नियमानुसार, रेल्वे काउंटरवरून तात्काळ तिकीट बुक करताना ओटीपी ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. म्हणजे, काउंटरवरून तिकीट काढताना तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल आणि तो ओटीपी सिस्टमवर फीड केल्यानंतरच तिकीट बुक होईल.

एजंटसाठी ३० मिनिटांची मर्यादा
एजंटमार्फत तात्काळ तिकीट काढताना देखील ओटीपी ऑथेंटिकेशन अनिवार्य असणार आहे. यासोबतच एक महत्त्वाचा नियम असा आहे की, बुकिंग विंडो खुलल्यानंतर ३० मिनिटांनंतरच एजंट तिकीट बुक करू शकतील. म्हणजे, एसी क्लाससाठी तिकीट बुकिंग विंडो सकाळी १० वाजता उघडते, तर एजंट त्या तिकीटांसाठी सकाळी १०.३० नंतरच बुकिंग करू शकतील. तसेच, नॉन-एसी क्लाससाठी बुकिंग विंडो ११ वाजता उघडते आणि एजंट ११.३० नंतरच तिकीट काढू शकतील.
ऑनलाइन तिकीटासाठी आधार अनिवार्य
ऑनलाइन तात्काळ तिकीट बुक करताना आधार ऑथेंटिकेशन देखील अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील आणि खरी ओळख असलेल्यांनाच तिकीट मिळेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला आहे.