Election Commission of India : गेल्या वर्षा देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. तर महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. तर आगामी पालिका निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. यातच आता भारत निवडणूक आयोगाने (ECI) एक मोठं पाऊल उचललं आहे. दरम्यान, ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असा निर्णय मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
२८०० हून अधिक नोंदणीकृत राजकीय पक्ष
दरम्यान, सध्या आयोगाकडे नोंदणीकृत २८०० हून अधिक नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक पक्षांनी RUPP म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली असून त्यात सध्या ३४५ पक्षांची निवड झाली आहे. हे पक्ष २०१९ पासून सहा वर्षांत एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचे कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाही, असे आढळले आहे. त्यामुळं या पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कारणे दाखवा नोटीस बजवणार…
२०१९ नंतर एकाही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत भाग न घेणारे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले पक्ष यामध्ये समाविष्ट आहेत. त्या पक्षाची अन्यायकारकपणे नोंदणी रद्द होऊ नये यासाठी संबंधित राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर या पक्षांना त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाईल. अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.