अहमदाबाद विमान दुर्घटनेवर संजय राऊतांचे भाष्य, सरकारला विचारले अनेक सवाल

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज्यसभा खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं, त्यांनी यावेळी बोलताना अनेक सवाल उपस्थित केले.

एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यावर काही क्षणात विमान खाली आलं आणि नागरी वस्तीतल्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं. यामध्ये विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील विद्यार्थी अशा एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजी वाहिली. शिवाय संजय राऊत यांनी संपूर्ण घटनेवर भाष्य केलं आहे. अनेक सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

संजय राऊतांनी सरकारला घेरलं

‘ या अपघातात 241 प्रवासी मृत्यू पावतात, विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे अनेक विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. मात्र इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही,’ अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर हल्ला चढवला.

भाजपनेच त्या काळात या ड्रीमलायनरवर आक्षेप घेतला होता. गैरव्यवहार खरेदीत झाला का? दबावाखाली ही खरेदी झाली का असे सवाल भाजपने तेव्हा केले होते. ३०० पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेले. म्हणून आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे प्रश्न उपस्थित करावे लागतात. यात 10 ते 12 महाराष्ट्रातील लोक आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे ? असा सवापही राऊतांनी विचारला.

भीषण अपघात; अनेकांनी गमावला जीव

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 जण क्रू मेंबर होते. दरम्यान, एनएसजीने क्रॅश झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळवला आहे आणि ते आता अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी बातमी समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने विमानाच्या अपघाताची रहस्ये कशी उलगडू शकतात.


About Author

Rohit Shinde

Other Latest News