Mumbai – गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे, अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरांतील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.
…अन्यथा कठोर कारवाई
सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी अधिकाधिक जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई महानगर हे अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे. तथापि, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. (श्रीमती) जोशी यांनी घाटकोपर स्थित ‘एन’ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आज (दिनांक १२ जून २०२५) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
समन्वयाने जबाबदारी पार पाडावी…
दुसरीकडे स्थानिक परिस्थिती, वर्दळीची ठिकाणे तसेच मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होणारी ठिकाणे आदी बाबींचा विचार करुन कचरा संकलनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचनाही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या. तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाला नेमून दिलेल्या परिसराची प्रामाणिकपणे स्वच्छता केली तर संपूर्ण मुंबई महानगर हे स्वच्छ आणि सुंदर राहील. यासाठी सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी आपापसातील समन्वयाने तसेच योग्य संवाद ठेवून जबाबदारी पार पाडावी. असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.