अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एक मोठी आणि चिंताजनक घटना घडली आहे. एअर इंडियाचे एक प्रवासी विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच शहरातील मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. विमानतळानजीक हे विमान कोसळले तसेच आजूबाजूला रहिवासी परिसर असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी बचावकार्य सुरू
हा अपघात एका रहिवासी परिसरात झाल्यामुळे, जीवितहानी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातानंतर तात्काळ फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते कोसळले. यामुळे अपघाताचे नेमके कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जात आहे. शिवाय समोर आलेल्या आतापर्यंतच्या आकड्यानुसार यामध्ये 50 लोकांनी जीव गमावला आहे.
मोठी जीवितहानी झाल्याची भीती
या अपघातात किती नुकसान झाले आहे, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कित्येक जखमी असून आतापर्यंत 50 लोकांनी जीव गमावला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल असे अपेक्षित आहे. लवकरच या अपघाताबाबतची अधिक माहिती समोर येईल.
