राज्यातील शेतकऱ्यांची आता पेरणीची प्रतीक्षा संपणार आहे. कारण, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून १३ जूनपासून राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे. अशा परिस्थितीत आता पेरणी करायला हरकत नाही असं कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठवाडा आणि विदर्भात त्या ताकदीने पाऊस सक्रिय झाला नसला तर आगामी काही दिवसांत त्या भागात पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात प्रतीक्षा
राज्यातील शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच 14 जूनपर्यंत राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही, असंही हवामान विभागाने म्हटलंय. त्यामुळे आता मोठ्या पावसाची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांची एकाप्रकारे चिंता वाढली आहे. किनाऱ्यालगतचे जिल्हे वगळता अन्य भागात मोठी गरमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

पावसाची सद्यस्थिती नेमकी काय?
देशात मान्सून यंदा लवकर दाखल झाला. मे महिन्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच झाले. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. हवामान विभागाने 13 जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
राज्यात ब्रेकनंतर मान्सून आता सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.