आणीबाणीची 50 वर्ष, पंतप्रधानांसह मंत्रिमंडळानं पाळलं मौन, भाजपा-काँग्रेसचं एकमेकांवर टीकास्त्र

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1975 साली देशात लादलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांवर केलेले वार-पलटवार पाहायला मिळाले

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आणीबाणीच्या काळातील पीडितांना श्रद्धांजली देण्यासाठी दोन मिनिटांचं मौनही बाळगण्यात आलं.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यात पुण्यातील मेट्रोच्या विस्तारासाठी 3626 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक्स पोस्ट लिहित काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसनं लोकशाही कैद केली होती, प्रसारमाध्यमांची स्वतंत्रता संपवली होती. अशी टीका केली.

आणीबाणी लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय- मोदी

देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात आणीबाणी हा एक काळा अध्याय आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये केली आहे. भारताच्या लोकशाहीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचंही मोदींनी म्हटलंय. आणीबाणी विरोधातला संघर्ष हा सामूहिक संघर्ष होता. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारला पुन्हा देशात लोकशाही बहाल करावी लागली आणि नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांचा पराभव झाला असंही मोदींनी म्हटलंय.

आणीबाणीविरोधात लढा देणाऱअया प्रत्येक व्यक्तीला सलाम करत असल्याचंही मोदींनी लिहिलंय. या विरोधासाठी देशातील विविध विचारधारेचे नेते-कार्यकर्ते एकत्र आले. एका ध्येयासाठी त्यांनी एकत्र काम केल्याचं मोदी म्हणालेत.

काँग्रेसचा पलटवार

त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपा त्यांची चूक लपवण्यासाठी हे सगळं नाटक करत असल्याची टीका केलीय. 50 वर्षांपूर्वी 25 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. 21 मार्च 1977 पर्यंत म्हणजे 21 महिने ही आणीबाणी देशात लागू होती. भाजपाकडून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मुख्यमंत्री फडणवीसांचंही टीकास्त्र

आणीबाणीच्या काळ्याकुट्ट कालखंडाला आज 50वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवी की देशात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याही वेळी लोकतंत्र सेनानींनी मोठा संघर्ष करत, आपल्या देशाचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले. म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे आणीबाणीला 50वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय : संविधान हत्या दिवस 2025’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.


About Author

Smita Gangurde

Other Latest News