जुलै महिन्यापासून ट्रेनने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. यासोबतच रेल्वे आपल्या महसुलावर लक्ष केंद्रित करत तिकीट दरवाढही करणार आहे. हे सर्व बदल जुलैपासून लागू होतील. अशा स्थितीत जाणून घ्या काय आहेत हे बदल:
ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये बदल
भारतीय रेल्वे ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी नियम बदलत आहे. 1 जुलैपासून तत्काळ तिकिटासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य होणार आहे. जे प्रवासी IRCTC मोबाइल अॅप आणि वेबसाइटवरून तिकीट बुक करतात, त्यांना आपले IRCTC खाते आधाराशी लिंक करावे लागेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर फक्त आधार-प्रमाणित खात्यांमधूनच तत्काळ तिकिटे बुक करता येतील.

काउंटरवरून तिकीट घेताना ओटीपी आवश्यक
ऑनलाइनप्रमाणेच ऑफलाइन तत्काळ तिकिटासाठीसुद्धा रेल्वे नियम बदलणार आहे. 15 जुलैपासून, रेल्वे काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करताना ओटीपी प्रमाणीकरण आवश्यक असेल. काउंटरवर तिकीट बुक करताना प्रवाशाच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो सिस्टमवर फीड केल्याशिवाय तिकीट बुक होणार नाही.
1 जुलैपासून तिकीट दरवाढ
1 जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ होणार आहे.
एसी वर्गासाठी: प्रति किमी 2 पैसे अतिरिक्त शुल्क
स्लीपरसाठी: प्रति किमी 1 पैसा अतिरिक्त
जनरल आणि एमएसटी: 500 किमीपर्यंतच्या प्रवासात कोणतीही वाढ नाही, पण त्याहून जास्त अंतरासाठी प्रति किमी 0.50 पैसा अतिरिक्त शुल्क लागणार.
हे बदल रेल्वेच्या महसुलात वाढ करणार असून, प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.