राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या दोन वेगवेगळ्या मार्गांवर धावणार असल्याची माहिती आहे, या गाड्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत होईल, प्रवासाला गती आणि सुविधा मिळेल. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून प्रवाशांची पसंती मिळताना दिसत आहे.
नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर धावणार एक्स्प्रेस
याबाबत जी माहिती समोर येत आहे त्यानूसार, पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर या दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मार्गांसाठी आवश्यक रेल्वे ट्रॅक चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी सांगितले की, अंतिम अहवाल मिळाल्यानंतर या मार्गांवर वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील. राज्यातील आजच्या स्थितीचा विचार केला असता सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आणखी दोन गाड्या वाढल्याने हा आकडा 13 वर जाईल.

सध्या वंदे भारत एक्प्रेस सीएसएमटी-जालना, सीएसएमटी-मडगाव, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद, नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदोर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या मार्गांवर धावत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यासंदर्भात काही खासदार आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. नव्या वंदे भारतबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.