मुंबई – तुमच्या दैनंदिन वापरात असलेल्या वायफाय आणि लॅपटॉपमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोय, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर.. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे.
अनेक जणं घरात लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात, त्यामुळे होणाऱ्या ऑलिगोस्पर्मिया या आजाराचा परिणाम थेट वीर्यातील शुक्रांणूवर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केलंत तर त्याचा थेट परिणाम तुमच्या प्रजनन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे.

लॅपटॉपमुळे पुरुष वंध्यत्वात वाढ
मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केलंत तर त्याचा मोठातोटा पुरुषांना सहन करावा लागू शकतो. डिसेंबर 2016 साली नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यास त्यातून पुरुष वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते, असा निष्कर्ष मांडण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार सध्या जगातील प्रत्येक सहाव्या पुरुषाला वंध्यत्वाचा सामना करावा वागतोय. देशाचा विचार केला तर भारतात 15 ते 20 टक्के जोडपी वंध्यत्वाचा सामना करतायेत. त्यातील 50 टक्के प्रकरणं ही पुरुष वंध्यत्वामुळं होत असल्याचं समोर आलंय.
लॅपटॉप आणि वंध्यत्वाचा काय संबंध?
शुक्राणूंची निर्मिती करण्यासाठी अंडकोषाचे तापमान हे शरिराच्या एकूण तापमानापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस कमी असणं आवश्यक असतं. त्यामुळे अडकोष शरीरापेक्षा वेगळे असतात जेणेकरुन ते थंड राहू शकतात. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यामुळे त्याची उष्णता थेट या भागावर परिणाम करते. यामुळे शुक्राणूंची प्रक्रिया मंदावते, याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होण्याची दाट शक्यता असते.
वायफायमुळे काय होते?
वायफायशी जोडलेला लॅपटॉप हा अधिक धोकादायक ठरु शकतो, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतायेत. वायफायमधून निघणाऱ्या किरणोत्सर्जनाचा परिणाम शरीराच्या नाजूक भागांवर, विशेष करुन अंडकोषांवर होण्याची दाट शक्यता असते. सातत्यानं वायफाय कनेक्ट असणारा लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो.
लॅपटॉप कसा वापराल?
लॅपटॉप वापरताना दर 30 ते 40 मिनिटांनी ब्रेक घेण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतायेत. सतत उष्णता जाणवू नये यासाठी हा उपाय उत्तम असल्याचं सांगण्यात येतंय. वायफायशी कनेक्ट असलेला लॅपटॉप वापरताना घट्ट कपडे घालून काम करु नका, असा सल्लाही देण्यात येतोय. संपूर्ण शरीरात हवा खेळती राहील अशा कपड्यांच्या नियोजनाचा सल्ला देण्यात येतोय. अशा काही सावधगिरी बाळगल्यास वंध्यत्वाचा धोका निर्माण होणार नाही असा विश्वासही तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतायेत.