वडेट्टीवारांच्या वक्तव्याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, मुख्यमंत्र्यांची वडेट्टीवारांवर टीका

देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत.

मुंबई – काश्मीरातील पहलगाम या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने सत्ताधाऱ्यावर टिका केली आहे. अतिरेकी हल्ल्यावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही हल्ल्यावरुन एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर चोहोबाजूनी टिकेचा भडिमार होत आहे. अतिरेकी पर्यटकांना गोळी धर्म विचारून मारण्याएवढा दहशतवादाकडे वेळ असतो का? असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. यावरुन वडेट्टीवार यांच्यावर टिकास्त्र डागले जात आहे.

जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार…

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांचा वक्तव्यावर भाजपाने टिका केली असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टिका केली आहे. काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य म्हणजे या हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडलेत, त्यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. प्रत्यक्ष घटनेतील नातेवाईकांनी सांगितले आहे. आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आहे. आता वडेट्टीवार हे तिथे बसून होते, हे हिकडे बसून काहीही स्टेटमेन्ट करत आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे अतिशय वाईट आहे. माझ्याकडे तर शब्दच नाहीत…. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे. त्यांच्या वक्तव्याने नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विजय वडेट्टिवार यांच्यावर केलीय.

पाकिस्तानी लोकांची आकडेवारी लवकरच समजेल…

या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून द्यावे, या मागणीला जोर धरु लागला आहे. सध्या भारतात पाकिस्तानातील लोकं किती राहतात? हा आकडा लवकरच पोलीस जाहीर करतील. भारतातून पाकिस्तानी नागरिक गेले पाहिजेत, अशी सर्वांची भावना आहे. या सर्व लोकांना ट्रॅकिंग करण्यात आले आहे. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला असून, त्यांना तत्काळ बाहेर जाण्यास सांगतले आहे. दरम्यान, ते सध्या काय करतात? कुठे जातात? कसे राहतात? त्या सर्वांचे ट्रेकिंग सुरू आहे. परंतू केंद्र सरकारने आखून दिलेल्या कॅटेगरीत कोणीही पाकिस्तानचा नागरिक असा नाही, जो आम्हाला सापडला नाही. सर्व सापडले आहेत, आणि त्यांना लवकरच पाकिस्ताना पाठवले जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दहशतवाद्याला जात-धर्म नसतो…

विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस आहे. दहशतवाद्यांना पांघरूण घालणाऱ्यांचा प्रयत्न होत आहे. देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत. “दहशतवाद्याला जात-धर्म नसतो” असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही. अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून केली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News