पुण्यातील सदाशिव पेठेत मद्यधुंद चालकानं 12 जणांना उडवलं, 4 MPSC चे विद्यार्थी जखमी; नेमका कसा झाला अपघात?

पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससीचे काही विद्यार्थी बोलत उभे होते. याचदरम्यान समोरून कार आली आणि त्या कारने या तरुणांना धडक दिली. या अपघातात १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पुणे – पुण्यातील सदाशिव पेठेत एका मद्यधुंद कार चालकानं भरदिवसा 12 जणांना उडवल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात चार एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झालेत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. यापूर्वीही पुण्यात अनेक हिट अँड रनच्या घटना समोर आल्या आहेत. दारू पिऊन पोर्शे कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता.

दरम्यान पुण्यात एका ठिकाणी उभ्या असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कारने धडक दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीला कार चालविता येत नव्हती, शिवाय तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही सांगितलं जात आहे. या अपघात प्रकरणात मद्यधुंद कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. कारचालक जयराम मुळे याच्यासोबत सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.

आतापर्यंत किती जणांना अटक?

आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आलीय. जयराम शिवाजी मुळे असे या चालकाचे नाव असून दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा पोलिसांनी अटक केलीय.

कसा घडला अपघात?

दिगंबर शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून तो बाहेर गेला होता. त्याचा सहकारी जयराम मुळे याने वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले. या अपघातात 11 लोकांना उडवलं. या सगळ्यांना किरकोळ आणि गंभीर जखमा झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाल्यानं पुण्यात संतापाची लाट उसळली. या अपघाताची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घएतली असून, या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News