मुंबई- महायुतीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा संघर्ष निर्माण झालाय. शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधणाऱ्या नितेश राणेंना निलेश राणेंना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसवला आहे, धाराशिवच्या मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतच असलेल्या राणे भावंडांमध्ये जुंपल्याचं दिसतंय.
महायुतीत नाराजी सूर, निलेश राणेंचा सल्ला
नितेश राणे यांच्या या वक्तव्यानं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटलाय. नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करत सांभाळून बोलण्याचा सल्ला नितेश राणेंना दिलाय.

निलेश राणे काय म्हणाले?
नितेश राणेंनी जपून बोलावं. मी भेटल्यावर बोलेनेच, पण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीचे आहोत हे विसरुन चालणार नाही
नितेश राणेंचं काय उत्तर?
या पोस्टला नितेश राणेंनी गंमतीशीर उत्तर दिलंय. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, अशी पोस्ट नितेश राणेंनी लिहीली आहे.
नेमका वाद काय?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीत निधी वाटपाच्या मागणीवरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद सुरु आहेत. भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांच्या तक्रारीनतंर समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आलीय. यावर मेळाव्यात भाष्य करताना नितेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष लक्ष्य करत देवेंद्र फडवणीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तेच बाप आहेत असं विधान केलंय.
विरोधकांचं टीकास्त्र
राणे भावडांमध्ये रंगलेल्या या जाहीर वादानंतर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळालीय. दोन्ही राणे भावंडांच्या वादानं युतीला चपराक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिलीय
भाजपाकडून सारवासारव
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर सारवासारव करत, मुख्यमंत्री यावर बोलतील असं सांगितलंय. कुणाला निधी मिळाला नसेल, अन्याय झाला असेल तर न्याय मिळावा, यासाठी नितेश राणे म्हणाले असतील. यामुळं काही जणांची मनं दुखावली असतील, तर त्यावर चर्चा करुन नाराजी दूर करू असंही बावनकुळे म्हणालेत.
महायुतीत भाजपा आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांतील सुंदोपसुंदी या निमित्तानं समोर आलीय. आक्रमक नेतृत्व अशी ओळख असलेल्या नितेश राणेंना त्यांच्या भावानचं जपून बोलण्याचा सल्ला देवून महायुतीच्या एकोप्याचीआठवण करुन दिलीय. आता या राणें बंधूंतील वादाचे भविष्यात काही पडसाद उमटण्याची शक्यता आहे.