Mumbai – मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, या धरतीवर पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५ मि. मी प्रत्येक्ष तासाची क्षमता असलेली आहे. मुंबईत सरासरी दरवर्षी १६ ते २० दिवस पाऊस पडतो. हा पाऊस एका तासाला १०० मि. मी पेक्षा जास्त असतो असेही पालिकेच्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळं केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला अधिकचा निधी मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
मुंबईच्या पुरपरिस्थितीची दखल केंद्राकडून…
सध्या ६ मोठी पंपिंग स्टेशन असून त्यामध्ये वाढ करुन मोगरा व माहुल येथे दोन नवी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे कुर्ला आणि अंधेरी येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईत ९ छोटी पंपिंग स्टेशन असून यामध्ये वाढ करुन महाराष्ट्र नगर व धारावी टी जंक्शन येथे दोन नवीन छोटी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबईच्या पुरपरिस्थितीची दखल केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात उपाययोजनांसाठी ५०० कोटींचा निधी केंद्र सरकारने महापालिकेला उपलब्ध करुन दिला आहे.

पुरपरिस्थितीचा अभ्यास होणार…
ज्या भागात पाणी तुंबते अशी ठिकाणे निवडून त्या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ही तासाला १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा करु शकेल अशी उभारण्यात येणार आहे. तसेच शहरातील पुरपरिस्थितीचा अभ्यास करुन एक कृती आराखडा तयार करण्यासही सांगितले असून या कामी मुंबई महापालिकेने जो आराखडा तयार केला त्याचा अभ्यास आयआयटीची तज्ञ समिती करीत आहे. याबाबतचा अहवाल आयआयटीच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे, सुमारे ५ हजार कोटींचा खर्च यासाठी येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. या साठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबई महापालिकेला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.