मुंबई – मुंबईच्या आरेच्या जंगलात कचऱ्याच्या पेटीजवळ सापडलेल्या आजीमुळं माणुसकी आणि नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्वचेच्या कॅन्सरने ग्रस्त यशोदा गायकवाड यांना त्यांच्याच नातवानं 21 जूनच्या रात्री चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं होतं. 22 जूनला जेव्हा यशोदा आजी सापडल्या तेव्हा खळबळ उडाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेल्या या आजी सातत्यानं नातवाचं नाव घेत होत्या.
आजींनी नातवाचं नाव घेतल्यानं पोलीस नातवापर्यंत पोहोचले खरे, पण नातवानं कांगावा केला होता. आजी आरेच्या जंगलात कशी पोहोचली हे माहीत नाही, असा लूर या नातवानं लावला होता.

नातवाचं वास्तव सीसीटीव्हीतून समोर
उतारवयात आजीवर ही वेळ आणणाऱ्या क्रूर नातवाचं बिंग सीसीटीव्हीमुळं उघड झालंय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, त्यात त्यांना सीसीटीव्हीची मदत मिळाली. या नातवानंच आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलं.
यशोदा गायकवाड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात विव्हळताना पोलिसांना आढळल्या होत्या. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या, त्यांना त्वचेचा दुर्धर आजार होता हेही समोर आलं. यशोदा आजींनी त्यांच्या नातवानेच इथे टाकल्यानं सांगितलं मात्र यशोदा यांना घरचा पत्ता सांगता येईना. अखेर 9 तासांनी पोलिसांनी आजीला कूपर रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी नातू सागर शेवाळेचा शोध घेतला, पण त्याने आरोप फेटाळले. आजी निघून गेली, असा दावा त्यानं केला पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा नातवानंच सहकाऱ्यांच्या मदतीन आजीला कचऱ्यात फेकल्याचं उघड झालं पोलिसांनी नातू सागर शेवाळे, रिक्षाचालक आणि एका नातेवाईकाला अटक केलीय
वैतागून नातवानं केलं कृत्य
या नातवाने हे का केलं, याचा घटनाक्रम त्यानं पोलीस जबाबात सांगितला. 21 जूनच्या रात्री आजी हिंसक झाली होती. आजी आरडाओरड करत होती, मारायला धावत होती, स्वतःचा गळा दाबून घेत होती, असं नातवानं सांगितलं. नातवानं 108 क्रमांकावर फोन लावून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतून आजीला शताब्दी रुग्णालयात नेलं. रुग्णालयानं आजीला अॅडमिट करण्यास नकार दिला, कूपर आणि नायर हे पर्याय सुचवले. त्यानंतर वैतागून नातवानं आणि सहकाऱ्यांनी आजीला तिथून नेलं आणि आरेच्या जंगलात कचऱ्यात फेकलं
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना उघड झाली असली तरी अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूलाही घडतायेत. दिवसेंदिवस क्षीण होत चाललेल्या नात्यांच्या गाठी आणि स्वार्थीपणातून हे घडत असल्याचं मत व्यक्त होतंय.