कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जरी पाऊस बरसत असला तरी विदर्भाची पावसाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. आजचा हवामान विभागाचा पावसाचा अंदाज नेमका काय, ते सविस्तर समजून घेऊ...

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची नोंद होणार असली तरी पुढील तीन दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा पावसाचा अंदाज सविस्तरपणे समजून घेऊ…

विदर्भ-मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा

राज्यात अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. तळ कोकणात मात्र पावसाने जोरदार थैमान घातलं आहे. हवामान विभागाने पुन्हा तीन दिवसांसाठी धोक्याचा इशारा दिला असून, 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून दाखल झाला असला तरी काही भागांत अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे, ज्यामुळे शेतकरीही चिंतेत आहेत. विशेषत: मराठवा़डा आणि विदर्भातील पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे.  भारतीय हवामान विभागाने 21 ते 24 जूनदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. ढगाळ हवामानामुळे उष्णतेत वाढ होण्याची शक्यता असून, घामाघूम स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी कोणताही हवामान इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना मुसळधार पावसासाठी अजून चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आज मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर ठाणे, मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईत तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांत पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढत जाणार असून, तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पाऊस बरसणार

मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये देखील यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी-अधिक राहणार आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची स्थिती समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या भागात शेती मशागत आणि पेरणीच्या कामांनी चांगलाच वेग घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News