महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांत राज्यात तुफान पूर्वमोसमी पाऊस कोसळला. त्याआधी अवकाळीने देखील थैमान घातलं होत. आता मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला आहे. या काळात विज कोसळणे, पुरात वाहून जाणे, छत कोसळणे या आणि अशा अनेक कारणांमुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामध्ये काही पशु पाळीव प्राण्यांचा देखील समावेश आहे. याबाबत आता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, नेमका हा आकडा काय सांगतोय? जीविताचं किती नुकसान झालं आहे? याबाबत आकडेवारीच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ…
आपत्ती व्यवस्थापन विभागाची आकडेवारी
आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मान्सूनपूर्व झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 22 प्राणी दगावले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. सर्वाधिक मृत्यूची नोंद पुणे आणि नांदेड जिल्ह्यात करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तिघांनी जीव गमावला आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण अशेच राहिल्यास हा जीविताच्या नुकसानीचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे, अशा परिस्थितीत काळजी घेणे अत्यंत जरूरीचे ठरते.

मुसळधार पावसात अशी घ्या काळजी
पावसाळ्यात स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. पावसात भिजल्यास सर्दी, ताप, अंगदुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर जाताना छत्री, रेनकोट वापरणे गरजेचे आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळा, कारण तिथे डासांचे प्रमाण जास्त असते. घरात स्वच्छता ठेवा आणि ओलसरपणा टाळा.
विजेच्या कडकडाटासह वादळ आल्यास सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असते. अशा वेळी घराच्या आत राहा आणि उघड्यावर जाणे टाळा. उंच झाडांखाली किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ थांबू नका. विजेमुळे उपकरणांचे नुकसान होऊ शकते, म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करा व प्लग काढा. खिडक्या, दरवाजे बंद ठेवा आणि पाण्याचा नळ वापरू नका, कारण वीज नळांमधूनही येऊ शकते. पाळीव प्राण्यांना घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा. जर बाहेर असाल, तर जमिनीवर झोपू नका; शक्य तितके खाली बसून आपले शरीर जमिनीपासून दूर ठेवा. हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा व सतर्क राहा.