पुण्यात सदाशिव पेठेत मद्यधुंद चालकानं एमपीएससी विद्यार्थ्यांसह 12 जणांना उडवलं, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

एमपीएससीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी पुण्यात कार अपघातात सहा एमपीेससीचे विद्यार्थी जखमी झाले. सदाशिव पेठेत घडलेल्या या अपघातानं एमपीेसएसी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा चर्चा झडतेय.

पुणे – पुण्यातील सदाशिव पेठेत एका मद्यधुंद कार चालकानं भर दिवसा 12 जणांना उडवल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात चार एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झालेत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.

या अपघात प्रकरणात मद्यधुंद कार चालकासह सह प्रवासी आणि कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आलीय. कारचालक जयराम मुळे याच्यासोबत सहकाऱ्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.

आत्तापर्यंत किती जणांना अटक?

आत्तापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आलीय. जयराम शिवाजी मुळे असे या चालकाचे नाव असून दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा पोलिसांनी अटक केलीय.

कसा घडला अपघात?

दिगंबर शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून तो बाहेर गेला होता. त्याचा सहकारी जयराम मुळे याने वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले
या अपघातात 11 लोकांना उडवलं. या सगळ्यांना किरकोळ आणि गंभीर जखमा झाल्या आहेत.

एमपीएससीचे विद्यार्थी जखमी

भावे हायस्कूलजवळ चहा घेत असलेल्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह 12 जणांना या कारनं उडवलं. जखमींमध्ये सहा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. एमपीएससी कट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आज रविवारी होतेय. त्यापूर्वी शनिवारी हा अपघात झाल्यानं हे विद्यार्थी परीक्षेला मुकले. ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी  झालेल्या या अपघातामुळे परीक्षार्थींची चिंता वाढली आहे. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची सरकारनं दखल घ्यावी आणि त्यांच्या  परीक्षेच्या तारखांबाबत सरकारनं पुनर्विचार करावा अशीही मागणी या अपघातानंतर करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाल्यानं पुण्यात संतापाची लाट उसळली. या अपघाताची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News