वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे फोटो पाठवा, पैसे मिळवा; दिल्ली ट्राफिक पोलिसांची अनोखी योजना

दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना अधिकार दिला आहे की, कुणी ट्रॅफिक नियम तोडताना दिसल्यास त्याचा फोटो काढून तुम्ही चालान पाठवू शकता. या कामाच्या बदल्यात तुम्हाला पैसेही मिळू शकतात.

दिल्ली: तिकडे दिल्लीत वाहतूक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. यामध्ये नागरिकांनाच ट्राफिक पोलिसांची भूमिका पार पाडता येणार आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना अधिकार दिला आहे की, कुणी ट्रॅफिक नियम तोडताना दिसल्यास त्याचा फोटो काढून तुम्ही चालान पाठवू शकता. या कामाच्या बदल्यात तुम्हाला पैसेही मिळू शकतात.

10 ते 50 हजार मिळवा, कसे?

जे नागरिक सर्वाधिक अचूक चालान पाठवतील, त्यांना दर महिन्याला 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाईल. नागरिकांसाठी ही कमाईची एक उत्तम संधी ठरणार आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून ‘Prahari’ अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांकाद्वारे OTP व्हेरिफिकेशन करून नोंदणी पूर्ण करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही चालान पाठवण्यासाठी पात्र ठरता.

फोटो पाठवा, पैसे कमवा

जर एखादी गाडी चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असेल, सिग्नल तोडलेला असेल किंवा चालकाने हेल्मेट घातलेले नसेल तर त्या गाडीचा स्पष्ट फोटो काढा आणि ‘Prahari’ अ‍ॅपवर अपलोड करा. त्यासोबतच त्या ठिकाणाचा पत्ता, वेळ आणि नियम उल्लंघनाची माहिती भरावी लागेल. त्यानंतर दिल्ली ट्रॅफिक पोलिसांची टीम तुम्ही पाठवलेला फोटो योग्य आहे की नाही, याची तपासणी करेल. त्यामुळे कोणीही खोटा किंवा सूडबुद्धीने पाठवलेले चालान चुकीच्या पद्धतीने स्वीकारले जाणार नाही. फसवणुकीपासून वाचण्यासाठी ही एक उत्तम व्यवस्था आहे.

तुम्ही पाठवलेले चालान योग्य ठरले की, ट्रॅफिक पोलीस त्या वाहनाच्या मालकाला तात्काळ नोटीस पाठवतात आणि तुम्हालाही याबाबत नोटिफिकेशन येतं की तुमच्याद्वारे पाठवलेले चालान यशस्वी ठरले आहे. दिल्लीतील अनेक नागरिकांनी या योजनेला कमाईचं साधन बनवलं आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक रँकिंग यादी जाहीर केली जाते – ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीस 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकावर 25,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकावर 15,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकावर 10,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस दिलं जातं.

दिल्लीतील वाहतूक नियमांची पायमल्ली 

दिल्लीतील वाहतूक नियम भंगाची समस्या गंभीर होत चालली आहे. वाहने सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीडिंग, रोंग साइडने चालवणे आणि हेल्मेट किंवा सीट बेल्ट न घालणे हे प्रकार वाढले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरील अकार्यक्षम नियंत्रण यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. अनेकदा वाहतूक पोलीस कमी असल्यामुळे नियमांचं पालन होत नाही. जनजागृती, कठोर दंड आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नियमांची अंमलबजावणी केल्यास या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. सुरक्षित वाहतुकीसाठी नियम पाळणे आवश्यक आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News