राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

राज्यात पावसाचा जोर येत्या तीन दिवसांमध्ये आणखी वाढणार आहे. राज्यातल्या 21 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. मान्सून अरबी समुद्राच्या किनारी भागात दाखल झाला आहे. यंदा 10 ते 12 दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी अजुनही पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना 29 मे रोजीही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एकंदरीत पुढील तीन दिवस पावसाचे राहणार आहेत, नेमका हवामान विभागाचा अंदाज काय? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस

राज्यात 29 मे ते 31 मे दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यात येत्या चार दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. इथे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा घाटमाथा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबईत पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहील.  मुंबईतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील. पुण्यात या काळात मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. इथे वारे अधिक वेगाने वाहतील.

मध्य महाराष्ट्राला इशारा

जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम या विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातली सध्याची पावसाची स्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. वादळ आणि पावसाच्या वेळी झाडाखाली थांबू नये. वादळी वातावरण असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. अशा पावसाळी वातावरणात नागरिकांनी काळजी घ्यावी.

About Author

Rohit Shinde

Other Latest News