मुंबई : ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचे दिसतेय, ऊर्जा निर्मितीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे. राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज (मंगळवारी) मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत ९ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महानिर्मितीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.
५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती…
दरम्यान, उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरु आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेती, उद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. तसेच या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

७ हजार २६० कोटी गुंतवणूक आणि ८ हजार ९०५ मेगावॅट प्रकल्प
दुसरीकडे जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या तर अवादा अॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
कोणत्या कंपनीतर्फे किती मेगावॅट वीज निर्मिती…
महाजेनको मार्फत –
- घाटघर येथे १२५ मेगावॅट वीज निर्मिती
- कोडाळी येथे २२० मेगावॅट वीज निर्मिती
- वरसगाव येथे १२०० मेगावॉट वीज निर्मिती
- पानशेत येथे १६०० मेगावॅट वीज निर्मिती
- महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत –
- मुतखेड येथे ११० मेगावॅट वीज निर्मिती
- निवे येथे १२०० मेगावॅट वीज निर्मिती
- वरंढघाट येथे ८०० मेगावॅट वीज निर्मिती
- अवादा अॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत –
- पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट वीज निर्मिती
- सिरसाळा येथे १२५० मेगावॅट वीज निर्मिती