Supreme Court On Minister Vijay Shah :सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी (१९ मे) पुन्हा एकदा मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत दिलेल्या विधानावर फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “आम्ही या प्रकरणात मंत्र्यांची माफी स्वीकारण्यासाठी तयार नाही.”
न्यायालयाने पुढे म्हटले, “आपण एक सार्वजनिक चेहरा आहात. एक अनुभवी नेता आहात. बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. आमच्या इथे आपले व्हिडिओ दाखवले पाहिजेत. हा लष्करासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला या प्रकरणात अत्यंत जबाबदारीने वागावे लागेल.”

SIT ची स्थापना
सुप्रीम कोर्टने या प्रकरणात एक SIT (विशेष तपास पथक) देखील गठीत केली आहे. यात तीन वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये एक महिला अधिकारीही असेल. हे तीनही अधिकारी मध्य प्रदेशच्या बाहेरचे असतील आणि ते मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाची तपासणी करतील.
‘संपूर्ण देशाला या वक्तव्याची लाज वाटते’
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, ‘या टिप्पणीमुळे संपूर्ण देशाला लाज वाटते. आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले. तुम्ही खूपच घाणेरडी भाषा वापरणार होतात, पण कदाचित तुमच्या मेंदूने तुम्हाला थांबवले, किंवा कदाचित तुम्हाला योग्य शब्द सापडले नाहीत. तुम्हाला लाज वाटायला हवी. संपूर्ण देशाला आपल्या सैन्यावर गर्व आहे आणि तुम्ही असा विधान केले आहे.’
‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे‘खंडपीठाने मंत्र्यांना विचारले, ‘ही कोणत्या प्रकारची माफी होती?’ तुम्ही तुमची चूक मान्य करून माफी मागायला हवी होती, पण तुम्ही म्हणता, की “जर मी असे म्हटलं असेल तर… मी माफी मागतो.” ही माफी मागण्याची पद्धत नाही. तुम्ही जी भयंकर टिप्पणी केली आहे, त्यासाठी तुम्हाला लाज वाटायला हवी’.
‘पहिला अहवाल २८ मे पर्यंत दाखल करावा‘
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यास सांगितले आहे. या पथकात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असेल. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या एफआयआरची चौकशी ही टीम करेल. एसआयटीने पहिला अहवाल २८ मे पर्यंत दाखल करावा, असे आदेशही खंडपीठाने दिले.
नेमकं काय विधान काय होतं?
मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी एका कार्यक्रमात कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंत्री शाह यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले होते, की “ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये लोकांची हत्या केली, त्यांच्या अंगावरील कपडे उतरवले, त्या अतिरेक्यांनी आपल्या बहिणींचं सिंदूर पुसून टाकले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच अतिरेक्यांच्या बहिणीला पाठवून त्यांची योग्य जागा दाखवून दिली.’ हे विधान चांगलेच व्हायरल झाले त्यामुळे मंत्री शाह यांना दोनदा माफी मागावी लागली.