मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेसवे) अवजड वाहनांची वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सध्या सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या उताराच्या भागावर, ज्याला खंडाळा घाट किंवा भोरघाट म्हणूनही ओळखले जाते, ट्रक व बससारख्या मोठ्या वाहनांसाठी सध्याची 40 किमी प्रतितास असलेली वेगमर्यादा 45-50 किमी प्रतितास करण्याचा प्रस्ताव समोर आहे.
सध्या भोरघाटातील उतारावर मोठ्या वाहनांना वेगाने खाली यावे लागते, त्यामुळे अनेकदा त्यांच्या विरुद्ध ई-चालान जारी होतो. ही समस्या कमी करण्यासाठी आणि ट्रक/बस चालकांचे गैरसोयीचे ई-चालान टाळण्यासाठी वेगमर्यादा वाढवण्याची योजना आहे.

कार व हलक्या वाहनांसाठी दिलासा नाही
कार किंवा अन्य हलक्या वाहनांसाठी मात्र कोणतीही वेगमर्यादा सवलत देण्याची योजना नाही. सध्या 10 किमी लांब घाट सेक्शनमध्ये कारसाठी 60 किमी प्रतितास वेगमर्यादा आहे आणि ती कायम राहणार आहे. अन्य भागात हलक्या वाहनांसाठी 100 किमी आणि अवजड वाहनांसाठी 80 किमी प्रतितास मर्यादा लागू आहे.
पहिल्याचवेळी नियमभंग केला तर ₹2000 दंड
कोणतीही गाडी वेगमर्यादा उल्लंघन करताना आढळल्यास पहिल्यांदा ₹2000 चा दंड आकारला जातो. पुढील उल्लंघनांमध्ये ही रक्कम अधिक वाढवली जाते.
संयुक्त पाहणी अहवालानंतर पुढचा निर्णय
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), राज्य परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स यांनी मिळून भोरघाट परिसराची संयुक्त पाहणी केली. ट्रक ऑपरेटर आणि काही अधिकाऱ्यांनी सध्याची 40 किमी/ता वेगमर्यादा “अवैज्ञानिक” आणि “अन्यायकारक” असल्याचे नमूद केले.
वेग वाढल्यास वेळ, इंधन आणि दंड वाचणार
अधिकाऱ्यांच्या मते, अवजड वाहनांना थोडा अधिक वेग दिल्यास वेळ, इंधन आणि देखभाल खर्च वाचेल तसेच अनावश्यक ई-चालान टाळता येतील. सध्या 95 किमी लांब एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) कार्यान्वित करण्यात आले आहे, ज्यात अनेक वेगमापन कॅमेरे आणि अन्य उपकरणे समाविष्ट आहेत. त्यामुळे घाट सेक्शनमध्ये ई-चालान मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.