हवामान अचूक अंदाज देणार ‘भारत फोरकास्ट सिस्टम’; नेमकी कशी चालणार प्रक्रिया?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी अर्थात IITM पुणे यांनी विकसित केलेली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक प्रणाली आता प्रत्यक्ष वापरात येणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी अर्थात IITM पुणे यांनी विकसित केलेली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक प्रणाली आता प्रत्यक्ष वापरात येणार आहे. यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे शक्य होणार आहे. आता या प्रणालीच्या प्रत्यक्ष वापराला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. या प्रणालीबाबत अधिक सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात…

भारत फॉरकास्ट सिस्टम, काय प्रणाली?

पावसाळ्यात हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. ‘भारत फोरकास्ट’ ही प्रणाली स्थानिक पातळीवर सहा किलोमीटर रिझोल्यूशनमध्ये हवामान अंदाज देऊ शकते. यामुळे पर्जन्यमान, चक्रीवादळे, तीव्र उष्णता, वादळे यांसारख्या हवामान घटनांचा अधिक अचूक अंदाज वर्तवता येणार आहे. या प्रणालीचा विकास 2017 मध्ये सुरू झाला होता. पारंपरिक 12 किमी रिझोल्यूशनच्या तुलनेत नवीन प्रणालीत त्रिकोणीय-क्यूबिक ऑक्टाहेड्रल (TCO) ग्रीडचा वापर करून, अधिक तपशीलवार व अचूक अंदाज वर्तविले जातात. विशेषतः भारतात, जिथे हवामानातील बदल अधिक तीव्र असतात, तिथे TCO ग्रीड रचना उपयुक्त ठरते. चाचणीत या प्रणालीने पावसाच्या अंदाजात 64% व अतिवृष्टीच्या बाबतीत 30% अचूकता दर्शविली आहे.

प्रणाली अत्यंत जलद चालणार

‘अर्का’ आणि ‘अरुणिका’ या उच्च क्षमतेच्या संगणकांच्या साहाय्याने या प्रणालीचे कार्य वेळेच्या तुलनेत अधिक जलद व प्रभावी झाले आहे. या प्रणालीचा वापर केल्याने कृषी, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, आरोग्य, वाहतूक अशा विविध क्षेत्रांत धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील. ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही पूर्णतः भारतात विकसित झालेली जागतिक दर्जाची प्रणाली आहे. त्यामुळे याचा प्रामुख्याने फायदा भारताला होणार आहे, शेतकरीवर्गाला अचूक हवामान अंदाजासाठी याचा फायदा होईल, आणि होणारे नुकसान टाळता येईल.

भारत फॉरकास्ट सिस्टम ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त सेवा आहे. या प्रणालीद्वारे हवामानाचा अचूक अंदाज मिळतो, ज्यामुळे शेतकरी पेरणी, पाणी व्यवस्थापन, खतांची फवारणी आणि कीड नियंत्रण यासारख्या कामांमध्ये योग्य निर्णय घेऊ शकतात. पावसाची शक्यता, वाऱ्याचा वेग, तापमान आणि आर्द्रतेची माहिती वेळेवर मिळाल्यास उत्पादन वाढते आणि नुकसान टाळता येते. या प्रणालीमुळे शाश्वत शेतीला चालना मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शेती अधिक वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते


About Author

Rohit Shinde

Other Latest News