पुण्यातील दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर आज ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दुपारी 3 वाजता दिवेघाट पार करेल आणि सासवडमध्ये पोहोचेल, तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरनंतर सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांची मोठी गर्दी रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. भक्तीचा जणू महासागर लोटल्याची परिस्थिती आहे.
माऊलींची पालखी दिवेघाटाकडे
माऊलींच्या पालखी सोबत पुणेकरांनी दिवेघाटापर्यंत मोठ्या संख्येने गर्दी केली. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात वारकरी भक्ती भावनेत तल्लीन झाले. या सोहळ्याने शहराला आध्यात्मिक ऊर्जेने भारले आहे. सकाळी भक्तिमय वातावरणात दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. आज दुपारी पालखी दिवेघाट पार करणार आहे. शिवाय आज दिवेघाटापर्यंत अनेक पुणेकर पालखीतील वारकऱ्यांसोबत चालताना दिसले.

पालख्यांचे आजचे मुक्काम कुठे?
गतवर्षीप्रमाणे यंदा देखील संत तुकाराम महाराज यांची पालखी आज दुपारी हडपसर येथे विसावा घेणार असून रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर येथे असेल. दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून सासवड येथे मुक्काम करणार आहे. या मुक्कामांमुळे वारकऱ्यांना विश्रांती घेण्याची संधी मिळेल.
पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालख्यांसाठी पोलीस प्रशासन अत्यंत दक्षतेने सुरक्षा व्यवस्था उभी करते. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात, त्यामुळे गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, मार्ग सुरळीत ठेवणे हे पोलीसांचे मुख्य उद्दिष्ट असते. प्रत्येक टप्प्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि वायरलेस सिस्टमद्वारे संपूर्ण मार्गावर नजर ठेवली जाते. आपत्कालीन मदत केंद्रे, वैद्यकीय पथक आणि जलद प्रतिसाद पथक सज्ज असतात. महिलांसाठी विशेष सुरक्षा दल नेमले जाते. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अहोरात्र तत्पर राहतात. शिस्तबद्ध आणि शांततेत वारी पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन मोठी जबाबदारी पार पाडते. त्यांच्या सेवेमुळे यात्रेला सुरक्षिततेचे मजबूत कवच मिळते.