Eknath Shinde – बाळासाहेबांचा राममंदीराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठता बसता तुम्ही टीका करता. मात्र पहलगामध्ये लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. शिवसैनिकाची तुम्ही किंमत केली नाही. त्याला कस्पटासमान वागणूक दिली, म्हणून तुमच्यावर आता कोणी युती करतो का, अशी अगतिक होण्याची वेळ आली, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी…
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संसदेवरील दहशतवादी हल्ला, पुलवामामधील हल्ला झाला. पण त्याचा हिशेब आणि जाब विरोधकांनी पाकिस्तानला विचारला नाही मात्र लष्कराला आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारताय. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मुक्तकंठाने पंतप्रधान मोदींची स्तुती केली असती पण तुम्ही हिशेब मागता. सीमेवर जिवाची बाजी लावून लढणाऱ्या लष्कराच्या जवानांबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी. जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही. अशा निशाणा शिंदेंनी विरोधकांना साधला.

लोकं सोडून जाताहेत याचं आत्मचिंतन करा…
शिवसैनिक म्हणजे देशभक्ती व राष्ट्रभक्ती नसानसांत भरलेला हिंदुत्वाचा अंगार आहे. मात्र याच शिवसैनिकाची तुम्ही किंमत केली, त्याला कस्पटासमान वागणूक दिली. त्यामुळेच आज कोणी युती करतो का अशी अगतिक होण्याची वेळ तुमच्यावर आली, तीन वर्षात इतके लोकं का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करा. सत्तेसाठी २०१९ ला मराठी माणसाचा विश्वासघात केला. बाळासाहेब म्हणाले होते, माझी शिवसेना काँग्रेस होऊ होऊ देणार नाही. मात्र काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा केला. तुम्ही हिंदुत्वाचा विश्वासघात केला, अशी खरमरीत टिका शिंदेंनी ठाकरे गटावर केली.