CM Devendra Fadnavis : सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. आज वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्जपुरवठ्याला प्राधामुळे अर्थव्यवस्थेला चालना…
या संस्था प्रगतीच्या मानक आणि विकासाच्या भागीदार ठरतात. या दृष्टीने वर्धमान बँकेने व्यावसायिकता जोपासतानाच कौशल्यपूर्ण कामकाजातून व्यावहारिकता सांभाळत चांगली वित्तीय व्यवस्था उभी केली. वित्तीय संस्थांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जास्तीत जास्त वित्तीय संस्था स्थापित झालेल्या प्रदेशाची आर्थिक आणि भौतिक प्रगती जोमाने होते. कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून बँकेचीही प्रगती झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

परिस्थितीनुसार बँकेनी काम केले पाहिजे
व्यावसायिक व राष्ट्रीय बँकांनादेखील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी निर्माण झालेले तंत्रज्ञान स्वीकारण्यास अवधी लागला. मात्र, त्या सर्व बाबी अर्बन बँकांनी गतीने स्वीकारून ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी सर्व सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. बँकिंग क्षेत्रात यापूर्वी मोठे बदल झाले तसेच काही नवी धोरणेही लागू झाली. मात्र, अशा परिस्थितीतही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सहकारी बँकांनी व्यावसायिकतेचा अवलंब करत नवीन परिस्थितीत स्वतःला स्थापित केले.