मुंबई: राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. आता पुढील सहा दिवस अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. तसेच अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. आज देखील पाऊस बरसणार आहे, नेमका हवामान विभागाचा अंदाज काय? ते समजून घेऊ…
अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
राज्यात अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. तर तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शेती क्षेत्राचं नुकसान
राज्यात पावसामुळे बागायती शेती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. हा आकडा अंदाज 25 हजार हेक्टरच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव, नाशिक, अमरावती, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, संत्रा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये प्रामुख्याने फटका बसला आहे. या भागात अद्याप मोठ्या प्रमाणात पंचनामे देखील सुरू झालेले नाहीत. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करावेत, आणि शासकीय मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अधिक मनुष्यबळासह हे पंचनामे होतात का, आणि तात्काळ मदत मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.