माळेगाव कारखान्याचं मैदान कोण मारणार? तीन पॅनलमध्ये लढत, आज मतदान

बारामतीच्या मालेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं आज मतदान होत आहे. यामध्ये तीन पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत असणार आहे.

बारामतीच्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. आज याच निवडणुकीच मतदान होत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज २२ जून २०२५ रोजी मतदान पार पडत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या 19 हजार 651 इतकी आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होत आहे.

तीन पॅनलमध्ये होणार प्रमुख लढत

यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. या तिन्ही पॅनेलमध्ये होणारी लढत कारखान्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र अद्यप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावणार का, याबाबत उत्सुकता कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी श्री शंभुसिह महाराज हायस्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे देखील मतदानासाठी दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी रंजन तावरे यांना शुभेच्छा दिल्या. रंजन तावरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

‘सत्ता कोणाची, सभासद शेतकरी ठरवतील’

मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ही लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे, ते तो पार पाडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील.” अशी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांना चेअरमन पदाच्या उमेदवारीबद्दल विचारले असता त्यांनी त्यावरही थेट विधान केले. “मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? मी ३५ वर्षे इथे काम करतोय” असे उत्तर त्यांनी दिले. सुप्रिया सुळे यांच्या बँक चौकशीच्या मागणीवर, “कुणी काहीही मागणी केली तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही,” असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

आता निवडणुकीत नेमकं कोणत्या पॅनलला यश मिळत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील कारखानदार आणि शेतकरीवर्गाचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष असणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News