मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या या उड्डाणपुलावरील लेन मार्किंग, सिग्नल आदी छोटी-मोठी कामं शिल्लक असून अवघ्या दोन दिवसात उड्डाणपुलावरील सर्व काम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी सज्ज होईल, महानगरपालिका प्रशासनातर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
कोणाला फायदा?
पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्वेकडील द्रुतगती मार्ग जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा अर्धा तास वाचणार आहे.

कसा आहे हा पूल?
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळ्या स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत. या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers) आदी सर्व कामे दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत.